ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘हा’ सिरियल किलर अतिबुद्धिमान लोकांचा मेंदू काढून त्याचा सूप प्यायचा…

सायको किलर किंवा सिरीअल किलर हे ऐकलं तरी सुद्धा अंगाला शहारे येतात. हे सुद्धा आपल्यासारखेच हाडामासाचेच बनलेले असतात. पण जरा डोक्याने हे विकृत असतात. आपल्याला दया माया आणि माणुसकी असते. (This ‘serial killer’ used to remove the brains of highly intelligent people and drink their soup)

पण या सिरिअल किलर असणाऱ्या विकृत लोकांमध्ये ना माया असते ना दया. माणुसकी तर अजिबातच नसते. म्हणूनच तर कुणाचा जीव घ्यायला हे कुठलाच विचार करत नाहीत. डोक्याने आणि मनाने हे सीरिअल किलर इतके विकृत असतात, की त्यांना केलेल्या कृत्यांवर जरा देखील पच्छाताप नसतो.

हे सीरिअल किलर आपल्या मध्येच मिळून मिसळून राहणाऱ्यांपैकी एक असतात. आपल्याला जरा देखील संशय येणार नाही की हा व्यक्ती कुणाचा खून देखील करू शकतो. पण तो डोक्याने कुठेतरी विकृत असतो, कुठली तरी गोष्ट त्याला खटकत असते आणि त्या कारणालाच धरून तो लोकांचा राग करू लागतो, आणि स्वतःच्या स्टाईल ने त्यांचा खून करतो.

यामधनं त्याला काय तर केवळ आनंद मिळत असतो. अश्याच एका विचित्र सिरीयल किलर बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. असे बोलले जाते की अतिबुद्धिमान लोकांचा मेंदू हा किलर काढून घ्यायचा. नेटफ्लिक्सवर ‘इंडियन प्रीडेटर: द डायरी ऑफ अ सीरियल किलर’ च्या स्ट्रीमिंगसह, सिरियल किलर राजा कोलंदरच्या क्रूर आठवणी पुन्हा एकदा लोकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.

प्रत्यक्षात राम निरंजन कोल याचे नाव राजा कोलंदर आहे. तो शंकरगड परिसरातील रहिवासी होता . राजा कोलंदर हा ९० च्या दशकात नैनी येथील सीओडी छिवकीचा कर्मचारी होता. त्याची पत्नी फुलन देवी त्या वेळी अलाहाबाद जिल्हा पंचायत सदस्य होती. राजा कोलंदर याने ९० च्या दशकातच गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला.

१९९८ मध्ये धुमानगंज पोलिस स्टेशन हद्दीतील मुंडेरा परिसरात भाड्याने टीव्ही-व्हीसीआर चालवणाऱ्या तरुणाची हत्या प्रकरणात राम निरंजन उर्फ राजा कोलंदरचे नाव पुढे आले होते आणि यानंतर तो फरार झाला होता. सन २००० मध्येही त्याने बेफाम घटना घडवून पोलिसांची डोकेदुखी वाढवली होती. त्याने आपल्या क्रूर कृत्याने परिसरात दहशत निर्माण केली होती.

आदिवासी कोल हा त्याचा समाज. त्याची दहशत पाहून त्याच्याच जातिबंधातील लोक त्याला कोल जातीचा राजा मानू लागले होते. त्यामुळे त्याचे नाव राम निरंजन कोल ऐवजी राजा कोलंदर असे झाले. पोलीस फाईल असो की सामान्य जनता, सर्वजण त्याला राजा कोलांदर या नावाने ओळखत होते.

आता त्याचा गुन्हा उघडीस कसा आला? तर अलाहाबादच्या शंकरगढ शहरात राहणारे पत्रकार धीरेंद्र सिंह हे ‘दैनिक आज’ या दैनिकात काम करायचे. आपल्या कामाने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यादिवशीही ते आपल्या कामावर जाण्यासाठी घरून निघाले, पण परत आलेच नाही. त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली.

धीरेंद्रच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जुन्या वादातून त्यांना राम निरंजन कोल नावाच्या व्यक्तीवर संशय होता. पत्रकार धीरेंद्र बेपत्ता झाल्यानंतर या संशयाच्या आधारे पोलिसांनी राम निरंजन कोल आणि त्याचा मेहुणा वक्षराज यांना अटक केली. पत्रकार धीरेंद्र बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले होते.

आता राजा कोलंदर पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली. पूर्वी तो पोलिसांना चकवा देत होता. पण नंतर त्याने पोलिसांसमोर एक कथा मांडली जे ऐकून पोलिसांनाही घाम फुटला. १४ डिसेंबर २००० रोजी पत्रकार धीरेंद्र सिंग यांची हत्या झाली होती, हे वास्तव होत. आता या हत्येमागे दडलेलं रहस्य पोलिसांसमोर उलगडणार होत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

या हत्येची स्क्रिप्ट १९९८ मध्येच लिहिली गेली होती. धीरेंद्र यांच्या खुनाच्या स्क्रिप्ट सोबतच १४ जणांच्या खुनाचे सुद्धा स्क्रिप्ट त्याच्या डायरी मध्ये लिहिले होते. जी डायरी धीरेंद्र यांच्या खुनाच्या संदर्भातून राजा कोलांदरच्या घरून पोलिसांनी प्राप्त केली होती. ते वाचून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला. लोक ज्याला सामान्य गुन्हेगार समजत होते, तो रानटी मनुष्यभक्षक असल्याचे समोर आले.

यावर खरं तर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आता हे प्रकरण केवळ पत्रकाराच्या हत्येचं नव्हे तर एका सीरियल किलरच होत. जो लोकांना मारायचा आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करायचा. मग तो मृत व्यक्तीच्या कवटीतून मेंदू किंवा शरीरातील इतर अवयव काढून ते उकळायचा आणि सूप बनवून प्यायचा…. बापरे अगदी ऐकूनच आपल्य पायाखालची जमीन सरकली.

पण तो हे का करायचा तर त्याला विश्वास होता की हे सूप त्याच्या मनाला तीक्ष्ण करेल आणि त्याला अफाट शक्ती आणि युक्ती येईल. इतक्या विकृत प्रकृतीचे लोक समाजात आहे यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. पुढे न्यायालयाने या क्रूर कर्म्याला मानसिक रोगी घोषित करत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

हे प्रकरण तब्बल १२ वर्षांनी उघडकीस आलं, हेही एक आश्चर्यच आहे, मात्र या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button