ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

असा झाला भारतात क्रिकेटचा प्रसार?

क्रिकेटचा जन्म इंग्‍लंडमध्ये झाला. इंग्‍लिश लोकांनी हा खेळ सुरू केला व त्याचा विकासही घडवून आणला. पण भारतात याचा प्रचार प्रसार कसा झाला, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

क्रिकेटचे असे झाले बारसे –

क्रिकेटची सुरुवात कोणत्या साली झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ब्रिटनचा भाग असणाऱ्या इंग्लंडच्या पश्चिमेस असलेल्या वेल्सच्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद केली गेली आहे.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश तरूण हा खेळ खेळू लागले. फ्रेंच भाषेतल्या ‘क्रिकेट’ ह्या शब्दाने ह्या खेळाचे नामकरण झाले. हा शब्द फ्रेंच भाषेतील असला तरी फ्रान्स मधले लोक क्रिकेट खेळत नाहीत.

भारतात झाला क्रिकेटचा प्रवेश –

क्रिकेट हा खेळ बहुतांश अशाच देशांमध्ये लोकप्रिय झाला जिथे जिथे ब्रिटिश राजवट होती. इंग्रज अधिकाऱ्यांना क्रिकेट हाच मुख्यत्वे टाईमपास होता. अन्य स्थानिक खेळ किंवा करमणुकीची साधने एकतर नव्हती किंवा जी होती ती ब्रिटिशांच्या उपयोगाची नव्हती.

त्यामुळे त्यांनी स्वतः तो खेळ इथे खेळला आणि स्वत:च्या स्वार्थासाठी प्रसिद्धही केला. १७३७ मध्ये कंपनीचे खलाशी बडोद्याजवळ केंबे येथे पहिल्यांदा क्रिकेट खेळले. ‘कलकत्ता क्रिकेट क्लब’ या पहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना १७९२ मध्ये ब्रिटिशांकडून करण्यात आली.

भारतीयांनी स्वीकारलं या खेळाला –

भारतीय उच्चभ्रू लोकांनीही हा खेळ पटकन स्वीकारला आणि १८४८ मध्ये, मुंबईतील पारशी समुदायाने ओरिएंटल क्रिकेट क्लबची स्थापना केली, जो भारतीयांनी स्थापन केलेला पहिला क्रिकेट क्लब होता. भारतात १८९२ पासून क्रिकेटची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा पहिल्यांदा सुरू झाली.

पारशी व युरोपीय संघांदरम्यान दरवर्षी सामने होत असत. ह्या सामन्यांना ‘दुरंगी’ अथवा ‘प्रेसिडेन्सी’ सामने म्हणत. हे सामने १९०६ सालापर्यंत खेळले जात होते. पुढे १९०७ साली त्यात हिंदूंचा संघ येऊन सामील झाल्याने त्या वार्षिक लढतीला ‘तिरंगी’ सामने हे नाव पडले आणि १९१२ मध्ये मुस्लिम संघ या लढतीत उतरल्याने त्याला ‘चौरंगी’ सामन्यांचे स्वरूप प्राप्त झाले. चौरंगी सामने १९३६ पर्यंत खेळले जात होते.

२० व्या शतकाच्या सुरुवातीस, काही भारतीय इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळायला गेले. रणजितसिंहजी आणि के. एस. दुलीपसिंहजी या भारतीय राजघराण्यातील क्रिकेटपटूंचे ब्रिटिशांनी खूप कौतुक केले आणि त्यांची नावे रणजी करंडक आणि दुलीप करंडक या भारतात खेळवल्या जाणाऱ्या दोन प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धांसाठी वापरली गेली.

भारताची पहिली टीम –

१९११ मध्ये, पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ब्रिटनच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर गेला होता, परंतु केवळ इंग्लिश काऊंटी म्हणजे प्रथम श्रेणी संघांशी खेळला होता, इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाशी नाही.

भारताचे कसोटीत पदार्पण –

भारताला १९२६ मध्ये इम्पीरियल क्रिकेट कौन्सिल अर्थात सध्याच्या इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलमध्ये आमंत्रित करण्यात आले आणि १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी खेळणारा देश म्हणून पदार्पण केले. या भारतीय संघांचे नेतृत्व सीके नायडू यांनी केलं होतं.

त्यांना त्यावेळी सर्वोत्तम भारतीय फलंदाज मानले जात होते. दोन्ही बाजूंमधील एकमेव कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला गेला. यावेळी संघ त्यांच्या फलंदाजीत मजबूत नव्हता आणि १५८ धावांनी पराभूत झाला.

एकदिवसीय सामन्यांनी बदललं चित्र –

१९७० पर्यंत भारताच्या दृष्टीने क्रिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीय कसोटी आणि त्यानंतर रणजी, दुलिप या देशांतर्गत स्पर्धा होत्या. पण १९७१ पासून मर्यादित षटकांचे एकदिवसीय सामने सुरू झाले आणि क्रिकेट मधली रंगत अजूनच वाढली.

कसोटीत तगडा असलेला भारतीय संघ हा एकदिवसीय प्रकारात कमकुवत मानला जात होता. ७५ च्या व ७९ च्या वर्ल्डकपमध्ये तर दुसऱ्या फेरीतही भारत पोहोचू शकला नव्हता. पण १९८३ मध्ये रवी, शास्त्री, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील व कर्णधार कपिल देव सारखे आक्रमक खेळाडू आल्यामुळे भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला.

…आणि क्रीडाविश्वाला ‘सचिन’ मिळाला –

यानंतर बरेच खेळाडू क्रिकेटकडे करियर म्हणून पाहू लागले. ८३ चा विजय लोकांनी टिव्हीवरून पाहिला आणि महाराष्ट्र, दिल्ली, बंगाल, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू अशा राज्यांमध्ये या खेळासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोरांनी बॅट आणि बॉल उचलला. यातूनच प्रेरणा घेऊन क्रिकेटला ‘भारतरत्न सचिन’ मिळाला.

क्रिकेट हा आज भारतीयांसाठी धर्म आहे, क्रिकेटमुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविधतेने नटलेला भारत क्रिकेट म्हटल्यावर ‘इंडिया इंडिया’ अशा आरोळ्या देतो. या बळावरच एकेकाळचा कमकुवत समजला जाणारा संघ भारत आज क्रिकेटमध्ये ‘महासत्ता’ म्हणून मिरवतो आहे.

ह्या खेळाने अनेक रथी महारथी भारताला दिले आणि क्रीडाविश्वात भारताला मानाचं स्थानही दिलं. इंग्रजांचा म्हणून हेटाळणीही त्याला सहन करावी लागत असली याच खेळाने आज आबालवृद्धांना एकत्र आणलं आहे.

आता या खेळाला पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप आलं असलं तरी त्यातला मूळ ‘खेळ’ लोप पावणार नाही आणि यापुढेही उत्तमोत्तम चुरशीचे सामने, रेकॉर्ड ब्रेक करणारी खेळी आपल्याला पाहायला मिळेल, अशी आशा करूया. क्रिकेटची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button