ताज्या बातम्याट्रेंडिंग

बॉलिवूड चित्रपट सारखे का फ्लॉप होत आहेत?

सध्या बॉलिवूड चित्रपटसृष्टी प्रेक्षकांवर जशी जादू करायला हवी ती जादू करण्यात असमर्थ ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा प्रत्येक चित्रपट मग तो लो बजेट असो किंवा हाय बजेट, फ्लॉप ठरताना दिसत आहे. काही चित्रपटांना तर बहिष्काराचा देखील सामना करावा लागतोय, ज्यात सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड चांगलच गाजत आहे. (Why are Bollywood movies flopping like this?)

प्रेक्षकांच्या मनात आपापली जागा पुन्हा निर्माण करण्यासाठी बॉलिवूड धडपड करताना दिसत आहे. मात्र आता प्रश्न उपस्थित होतो की अचानक बॉलीवूडला प्रेक्षकांची नापसंती का मिळत आहे? यामागीलच कारण आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

याचे सर्वात प्रथम कारण आहे रिमेक चित्रपटांची निर्मिती. सध्या बॉलीवूडने रिमेक बनविण्याचा जणू ट्रेंडच सुरु केला आहे. हा चित्रपट बनविण्याचा अतिशय सोपा मार्ग समजला जातो. तो हॉलीवूडचा चित्रपट असो किंवा टॉलिवूडचा, बॉलिवूड चित्रपटसृष्टी या सर्व चित्रपटांचा रिमेक बनवत असल्याचे पाहायला मिळते.

हे चित्रपट यासाठी प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकत नाही कारण याची कथा नवीन नसून सर्वांनाच माहित असते. दुसरे कारण आहे चित्रपटाचे संगीत, आजकाल केल्या जाणाऱ्या गाण्यांचे बोल तर प्रभावशाली नसतातच, मात्र याचे म्युजिक देखील फार उत्तम नसते.

आजकाल चित्रपटात रॅप आणि ऑटो- ट्यून गाण्याचा समावेष केला जातो. बॉलिवूडमधील दिग्गजांनी गायलेल्या गाण्यांना ऑटो- ट्यून करून प्रदर्शित केल्यामुळे ही गाणी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्यास असमर्थ ठरतात. कारण ड्युप्लिकेट संगीत लोकांना आवडत नाही ते कायम नाविण्याच्या शोधात असतात.

तिसरी चूक आहे चित्रपटात होणारी कास्टिंग. कास्टिंग हि चित्रपटाचा सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो, मात्र काही ठिकाणी आपल्या लक्षात येते की हा कलाकार या पात्रासाठी बनलाच नाही आहे. आता अक्षय कुमार याची पृथ्वीराज चव्हाण ही भूमिका लोकांना आवडली नाही. तो या रोल साठी फिट नाही असे चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांचे सांगणे होते. त्यामुळे कास्टिंग देखील फार महत्वाचा टप्पा असतो.

चित्रपट फ्लॉप ठरण्यामागे अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रेक्षकच सिनेमागृहाकडे न वळणे. आता असं का तर, याला कारणीभूत ठरत ओटीटी प्लॅटफॉर्मचा उदय. ओटीटी कडे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात वळल्याचे पाहायला मिळत आहे.

लोक सिनेमागृहात पैसे देण्याऐवजी महिन्याचे सब्स्क्रिप्शन घेण्याला जास्त महत्व देतात कारण यात पैशांची बचत होते. काही कलाकारांचे राजकीय संबंध देखील त्यांचा चित्रपट फ्लॉप ठरण्याला कारणीभूत असतात. कलाकार राजकीय नेत्याशी संलग्न झाले तरी देखील प्रत्येक जागेंवर ही सलंग्नता कामात येत नाही.

लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते आणि जेव्हा कलाकार एखाद्या पक्षाची राजकीय भूमिका मांडू लागतो तेव्हा त्याचे स्थान प्रेक्षकांच्या मनातून खाली येत.

हे तर झाले चित्रपट फ्लॉप ठरण्याची कारण, मात्र काही चित्रपट असे देखील येऊन गेलेत जी खरंच आपलयाला विचार करायला भाग पाडतात. यात काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांची सर्वत्र प्रशंसाच झाली.

आलिया भट्ट ने साकारलेलं गंगुबाई काठियावाडी मधील गंगुबाई हे पात्र,.दस्वी चित्रपटात अभिषेक बच्चन याने साकारलेलं पात्र, दिल धडकने दो मधील शेफाली शाह च पात्र, यांसारख्या अनेक कलाकारांचा यात समावेश आहे.

त्यामुळे बॉलीवूडला आता चित्रपटांच्या कथानकावर, चित्रपटात होणाऱ्या कास्टिंग वर, सोबतच चित्रपटांच्या गाण्यांवर काम करण अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच बॉलिवूड आपली जागा प्रेक्षकांच्या मनात पुन्हा निर्माण करण्यात यशस्वी ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button