ताज्या बातम्याट्रेंडिंग

ऑस्करवाडी मिसळने कसा गाठला कमी वेळेत यशस्वी टप्पा, जाणून घ्या यामागील संघर्ष…

मराठी माणसासाठी मिसळ खाणे म्हणजे जणू एक आनंद सोहळाच असतो. रूप रंगाने देखील ही मिसळ अगदी मराठी माणसासारखीच. आता मिसळ खाणारे मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ खातील असेही नाही, त्यांचीही एक जागा ठरलेली असते. (Know the struggle behind how Oscarwadi Misal reached a successful milestone in a short time)

जिथली चव भारी तिथलीच मिसळ भारी, त्यामुळे लोकांचे मराठमोळे उपहारगृह ठरलेले आहेत. आता ऑस्करवाडी मिसळची चर्चा तर सर्वच मिसळ प्रेमींनी ऐकली असेल. या मिसळचा आस्वाद घ्यायला लोक दुरदुरून येतात, हे केवळ त्याच्या वेगळ्या नावामुळे नाही तर तिथल्या खास चवीमुळे.

मात्र या ऑस्करवाडी मिसळ मागेही अथक परिश्रम लपलेला आहे जो कदाचितच कुणाला माहिती असेल. आज यामध्ये आपण ऑस्करवाडी मिसळने इतक्या कमी वेळात यशाचा टप्पा कसा गाठला? इतका मोठा व्यवसाय कसा उभा केला, यामागे कुणाचा हात आहे, हेच थोडक्यात जाणून घेऊयात.

कदाचित या कहाणीने आजच्या युवा वर्गाचे, जे आयुषयात काहीतरी करू पहात आहेत, त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळू शकतील. आता प्रत्येकालाच साहाय्य करणारे किंवा मदत करणारे वडील किंवा अजून कोणी मोठं व्यक्ती आर्थिकदृष्ट्या त्याच्या पाठीशीच असत असं नाही, जगात असेही अनेक यशस्वी लोक होऊन गेलेत ज्यांनी सर्व स्व कर्तृत्वावर केलं.

आता ऑस्करवाडी मिसळ बद्दल सांगायचं सोडून ही काय बोलत आहे, असं तुम्हला वाटत असेल, पण खर सांगायचं झालं तर याची सुरुवात होते ती अगदी गरीब कुटुंबातल्या एका मुला पासून, ज्याने परिस्थितीशी लढत ऑस्कर वाडी मिसळचा भला मोठा व्यवसाय उभा केला, तोहि स्वतःच्या बळावर.

या यशस्वी व्यवसायामागचं नाव आहे अक्षय काटके. अक्षय हा अगदी गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलगा. परिस्थितीमुळे आई- वडिलांनी त्याला वर्षोनुवर्षे चालत आलेला दूध व्यवसाय करायचा सल्ला दिला. मात्र त्याला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे होते आणि घरावर असलेले गरिबीचे संकट कायमचे दूर करायचे होते.

चित्रकलेत त्याला रस असल्यामुळे त्यानी पुण्यातील एका कॉलेजमध्ये ग्राफिक्स डिझाईनिंग चा कोर्स केला. एका प्रोडक्शन हाऊस मध्ये चांगल्या पगाराची नौकरीही मिळवली. घरचे फार आनंदी होते मात्र काही महिन्यातच त्याने या नौकरीला राम राम ठोकला. स्वतःच काहीतरी करायचं म्हणून त्यांने वेब सिरीज बनवायचा निर्णय घेतला.

१५ जुलै २०२० ला त्याची पहिली वेब सिरीज आली. त्याच्या वेब सिरीजमध्ये काम करणारे सर्व अनुभवी कलाकार सोडून गेले, अक्षयचे सांगणे आहे कि त्याच्यावर आलेला तो सगळ्यात वाईट काळ होता, मात्र या काळात त्याने रडायचं नाही तर लढायचं ठरवलं. आणि आपल्या वेब सिरीज सुरु ठेवल्या.

काही आर्थिक साहाय्य म्हणून पुढे त्याने व्यवसायात उतरायचे ठरवले तेव्हा ऑस्करवाडी मिसळ ही कल्पना त्याला सुचली. ऑस्करवाडी वेब सिरीज संपूर्ण जगभरात पोहोचल्या होत्या म्हणून त्याने हेच नाव आपल्या व्यवसायाला द्यायचे ठरवले. हॉटेल सुरु झाल्याच्या एकाच हफ्त्यात ऑस्करवाडी मिसळ चे नाव सर्वत्र पोहोचले.

ही मिसळ इतकी फेमस होण्याचे कारण म्हणजे इथली चव. लोक दुर दुरून केवळ मिसळची चव घेण्याकरिता येऊ लागले आणि अगदी ५व्याच दिवशी त्यांना फ्रेंचायजी साठी कॉल आला. आज जवळ जवळ या मिसळच्या २६ शाखा आहेत. याच्या शाखेसाठी अगदी कर्नाटक आणि राजस्थान वरून सुद्धा मागणी येत आहे.

त्यांच्या ऑस्करवाडी युट्युब चॅनलला सुद्धा तब्बल ६ लाख १० हजार फॉलोवर्स आहेत. अक्षय चे सांगणे आहे की कधीच मला मोठं होऊन बंगला किंवा गाडी घ्यायची आहे असं माझं स्वप्न नव्हतच, माझं केवळ एकच स्वप्न होत ते म्हणजे आई वडिलांना आरामाचं आयुष्य देणं आणि ते देण्यात मी यशस्वी झालो आहे.

मला वाटत ही कहाणी अगदी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. कितीही संकटं आली तरी खचून न जाता त्याचा सामना केला आणि स्वतः वर विश्वास ठेवला, तर नक्कीच आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळेल. फक्त प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. कुणाला त्याच्या परिश्रमाचे फळ फार लवकर मिळते, तर कुणाला उशिरा. मात्र मिळते हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button