मीठ बेताने खा, अपाय टाळा..
मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. जेवण चविष्ट करणारं हे मीठ सुद्धा प्रमाणातच चांगलं असतं. नाहीतर काय होईल? याबद्दलच आपण जाणून घेऊ.
वरून मीठ घेण्याची सवय नकोचं….
बऱ्याच जणांना चवीपुरतं मीठ घातलेलं असून सुद्धा वरून मीठ घ्यावं अशी इच्छा होत असते. अनेकदा आपण चव घेऊन पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की मीठ कमी पडलं आहे, म्हणून वरून मीठ घेण्याची सवय असते. पण ही सवय चांगली नाही. कारण या सवयीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या भारतीय आहारात सर्व पौष्टिक पदार्थ असतात, म्हणूनच त्याला चौरसाहार पद्धती म्हणतात. पण भारतीय चटपटीत खाण्यावर भर देतात. आपण वरचेवर खातो त्या लोणची, पापडात ही मीठ जास्तच असतं. पण वयोमानापरत्वे या पदार्थातून खाल्ल्या जाणाऱ्या मिठावर निर्बंध यायला हवेत.
जास्त मीठ आरोग्यकासाठी हानिकारक
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं हे मीठ जास्त झाल्यामुळे होतं. यामुळं मज्जातंतू आणि हृदयावर हे नकारात्मक परिणाम होतो. जास्त मिठामुळे रक्ताच्या गुठळ्या होणं, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येणं, रक्ताला प्रमाणाहून जास्त प्रवाहीपणा येणं, अशा गोष्टी होतात. मीठामध्ये मूलभूत घटक सोडियम असतो. सोडीअमची मात्रा जास्त शरीरात जास्त झाली असता सोडीअमसोबत कॅल्शियमही शरीराबाहेर पडतं यामुळे हाडांना ठिसूळपणा येणं वगैरे सारखे विकार होऊ शकतात. मीठ जास्त झाल्यामुळे महत्वाचा होणारा परिणाम उच्च रक्तदाब. म्हणून ज्यांना उच्च रक्तदाब होतो त्यांना लो सोडियम मीठ किंवा सरळ अतिशय कमी मीठ असलेले पदार्थ खाण्याबद्दल सांगितलं जातं.
‘हे’ आहे मिठाचे योग्य प्रमाण:
जागतिक आरोग्यावर संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार भारतीय लोक निर्धारित प्रमाणाच्या बाहेर जाऊन मीठ सेवन करतात. आहारात मीठ कमी केल्यास हृदयरोगाचं प्रमाण २५-३०% ने कमी होतं. तसेच कमी मीठाचे पदार्थ खाल्ले असता आपल्या किडन्या निकामी होण्यापासून बचाव होतो. म्हणून प्रौढ व्यक्तीने केवळ २ चमचे इतकंच मीठाचं सेवन करावं.
आता हा लेख वाचून झाल्यानंतर आपण ही स्वतःची सवय बदलणार असू तर ते फायदेशीर आहे. मीठाचं सेवन अत्यंत गंभीर परिणाम करू शकतं, हे आपल्याला कळलं असेलच म्हणूनच यासाठी संस्कृतातील ही ओळ अगदीच योग्य आहे, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’.